‘अवेळी’ पावसाचा फायदा   

विशेष , प्रा.डॉ.मुकुंद गायकवाड 

मोसमी पावसाच्या आधी आलेल्या पावसाच्या तांडवात शेतकर्‍यांचे नुकसान होत असले तरी त्याचे बरेच लाभही होतात. विशेषत: या पावसावर ‘धूळपेरणी’ करुन अल्पावधीत हाती येणारी पिके घेतल्यास चांगला आर्थिक लाभ मिळतो. त्यामुळेच अवकाळीमुळे कांदा, आंबा, जांभूळ, कागदी लिंब यासारख्या पिकांचे नुकसान होत असले तरी हुशार शेतकरी त्याचा लाभही घेताना दिसतात.
 
हवामान खात्याकडून या वर्षी चांगल्या आणि सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त झाल्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण असतानाच अवकाळीचा तडाखा बसल्यामुळे शेतीचे नुकसान सहन करावे लागणे, ही निश्चितच चिंतेची बाब म्हणावी लागेल.कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र अवकाळीचा सामना करत होताच त्यात मान्सून लवकर दाखल झाला आहे.. मराठवाड्यातील काही भागामध्येही अवकाळीचा त्रास झाला.. यामुळे एकंदर महाराष्ट्रातच उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे. यात आंब्याचे नुकसान सर्वाधिक असून जगभर ओळखल्या जाणार्‍या हापूस आंब्याचा हंगाम महिनाभर आधीच संपला. याचा फटका कोकणातील आंबा उत्पादकांना सहन करावा लागला ऊन तापते तसे आंब्याची प्रतवारी आणि गोडी वाढते. मात्र त्याला पाणी लागले तर डाग पडतात. कीड लागते आणि आंबा पडून खाण्यायोग्य रहात नाही.
 
आंब्यावर ‘काळी बुरशी’ सारखा रोग पडल्यास चांगला भाव मिळत नाही आणि आंबा उत्पादकांना नुकसानीचा सामना करावा लागतो. त्यामुळे आंबा उत्पादनाच्या सुरूवातीपासून म्हणजेच मोहोर धरण्यापासून आंबा उतरवेपर्यंत उत्पादक ऊन कडक असण्याची अपेक्षा व्यक्त करतो. कोकणामध्ये काही शेतकर्‍यांचे वर्षभराचे आर्थिक गणित आंब्याच्या उत्पादनावर अवलंबून असते. त्यामुळेच या पिकाला अवकाळीचा तडाखा बसल्यास त्यांचे वर्षभराचे गणित कोलमडते. मात्र यंदा ‘केशर’ वा देवगड आंब्यावर याचा फारसा परिणाम दिसला नाही. केशर बाजारात उशिरा येतो तर एव्हाना देवगड हापूसचा हंगाम संपला आहे. त्यामुळे याचे उत्पादक अवकाळीच्या परिणामातून वाचले आहेत.
 
या काळात शेतात बाजरी, मुग, भुईमुग ही पिके असतात. ती परिपक्व अवस्थेत असतात. जांभळाचा हंगामही ऐन भरात असतो. द्राक्षाची छाटणी झाल्यामुळे या फळपिकाचे अवकाळीने फारसे नुकसान होत नाही, मात्र वर उल्लेख केलेली उन्हाळी पिके आणि जांभळासारखे नाजूक फळ मात्र या तडाख्यात  अडकते. अवकाळी पावसाने या सर्व पिकांचे जवळपास १५ ते २० टक्के नुकसान झाल्याचे समोर येत आहे. अर्थात असे असले तरी उशिरा पेरणी केलेल्या पिकांना या पावसाची चांगली मदत होणार आहे.
 
बाजारावर परिणाम करणार्‍या पिकांमध्ये कांद्याचा समावेश होतो. सध्या कांदा काढणीच्या अवस्थेत आहे. अशा वेळी अवकाळीचा तडाखा बसल्यामुळे कांद्याचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.  शेतकरीवर्गाला त्याची किंमत मोजावी लागत आहे..  उन्हाळ्याच्या अखेरचा हा काळ जनावरांच्या चार्‍यासाठीही महत्त्वाचा असतो. या काळात शेतकरी कडबा काढतात. तो उंच वाढतो. मात्र अवकाळी आणि जोरदार वार्‍यामुळे कडबा जमिनीवर लोळतो.  उन्हाळी पिकांमधील कागदी लिंबालाही या अवकाळीचा मोठा फटका बसला. उन्हाळ्यात लिंबाला चांगली मागणी असते. भावही चांगला मिळतो. रोजच्या वापराखेरीज कॅनिंग सेंटरमध्ये वा साठवणूक स्वरुपात वापरली जात असल्यामुळे लिंबाच्या विक्रीतून शेतकरी चांगला नफा कमावतो. मात्र अवकाळीमध्ये हे पीक जमिनदोस्त झाले.लिंबावर ‘कॅकर’ नावाचा रोग पडतो. उत्पादकांना हे नुकसान सोसावे लागले.
 
प्रत्येक वर्षी वळीव अपेक्षितच असतो. वळिवाचा पाऊस चांगला झाला तर रोहिणी नक्षत्राच्या आधीचा पाऊस चांगला होतो. त्यामुळेच वळीव चांगला पडणे ही एकीकडे शेतकर्‍यांसाठी आनंदाची बाबही असते. हुशार शेतकरी या पावसावर  उन्हाळी मूग आणि ‘आस्केल’ जातीचा वाटाणा मोठ्या प्रमाणात घेतात. बिगरहंगामात बाजारात येणार्‍या या पिकाला ४० ते २०० रुपये प्रति किलोपर्यंतचा भाव मिळतो. यामुळेच धूळपेरणीतून येणारी ही पिके घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल असतो.  प्रत्यक्ष पाऊसकाळ सुरू होण्यापूर्वीच ही पिके हाती येतात. वाटाण्याला सामान्य बाजाराबरोबरच पंचतारांकित हॉटेल्समध्येही चांगली मागणी असते. आपल्याकडे पारनेर, पुरंदर भागामध्ये हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
 
थोडक्यात, एकीकडे अवकाळीने झालेले नुकसान काही भागातील शेतकर्‍यांना रडवत असताना या भागातील उत्पादक मात्र अवकाळीने सुखावले असल्याचे चित्र दिसत आहे.  या दिवसात लावलेला कांदा जास्त टिकत असल्यामुळे शेतकर्‍यांची लागवडीची लगबग वाढल्याचे चित्रही बघायला मिळत आहे.वळिवाचा पाऊस चांगला झाला तर मृग नक्षत्रातील पाऊस मनासारखा बरसतो. म्हणूनच हा काळ खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीचा असतो. हा पाऊस न पडल्यास पेरण्या उशिरा होतात. स्वाभाविकच वळीव पडून वेळेत पेरण्या झाल्यास खरीप पिकांची पेरणी वेळेवर होते आणि पिके वेळेत हाती येतात. त्याचबरोबर या पावसाने जनावरांच्या तसेच माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो. यंदा राज्याबरोबरच संपूर्ण देशाने उन्हाचा प्रकोप अनुभवला.  अनेक गावांना शोष पडलेला दिसला. टँकरने पाणी पुरवण्याखेरीज पर्याय नव्हता.  भटके प्राणी आणि वन्य जीवांचीही उन्हाळ्यात पाण्यासाठी तडफड होते. तेव्हा वळवाचा पाऊस या सर्वांसाठी एक वरदान असतो. 
 
पावसाळ्यापूर्वी शेतीची मशागत आणि पूर्वतयारी करतानाही हा पाऊस शेतकर्‍यांसाठी उपयुक्त ठरतो. कडक उन्हात जमीन होरपळून निघते. भेगाळते. अशा वेळी खरिपाची तयारी करताना, मोठाली ढेकळे फोडताना मोठी यंत्रणा लावावी लागते. मात्र वळीव चांगला पडला तर नांगरणीचे काम तुलनेने सोपे होते. ढेकळे लवकर मोडतात. मशागत सोपी होते. वळिवाने शेतकरी सुखावण्याचे हेदेखील एक कारण आहे. 
 
वळिवाचा पाऊस वातावरणातील उष्णता कमी करतो. यामुळे उष्माघाताचा धोका कमी होतो. खेरीज वळिवाच्या पावसावर शेतकरी अवघ्या २१ दिवसांमध्ये तयार होणार्‍या पालेभाज्या घेतात. उन्हाच्या तडाख्याने भाज्यांचे भाव वाढवल्यामुळे तसेच आवक कमी असल्यामुळे होणारा त्रास कमी होतो. भाज्यांची आवक वाढल्यामुळे भाव उतरतात आणि रास्त किमतीत पालेभाज्या उपलब्ध होतात. ग्राहकांना त्याचा फायदा होतो. 
 
या पावसामुळे विहिरींमधील पाणीसाठा वाढतो. जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. कोल्हापूर पद्धतीचे केटीवेअर बंधारे या पावसाने भरतात. तसे झाल्यास आजूबाजूच्या विहिरींना चांगले पाणी येते. शेतकरी त्या पाण्यावर पिके घेऊ शकतात. विशेषत: सवा महिन्याच्या काळात तयार होणार्‍या भेंडी, गवार यासारख्या भाज्या यावर सहज येतात. याच काळात तयार होणारा मकादेखील हाती येतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चांगले खाद्य मिळाल्याने दुभत्या जनावरांचे दूध वाढते. उन्हाळ्यात ते खूप कमी होत असल्यामुळे दुग्धोत्पादक शेतकरी चिंतेत असतात. मात्र वळवाचा पाऊस ही काळजी मिटवतो. थोडक्यात, हुशार शेतकरी या पावसाचा नेमका फायदा करुन घेतो.
 
(शब्दांकन: स्वाती पेशवे)

Related Articles